कवी कधी होत नसतो म्हातारा...
माझ्यासमोर एक गंभीर प्रश्न पडलेला आहे. प्रेमकविता लिहायची असेल, तर कवी तरुणच असला पाहिजे का? तसेच तो सुंदरही असायला हवा का?- हा पश्नच अप्रस्तुत आहे, असं आपण निश्चितच म्हणाल. पण नाही! त्याचं असं झालं की, एका कविसंमेलनाच्या आयोजकांनी फक्त तरुण कवींनाच प्रेमकविता सादर करण्यासाठी आमंत्रित केलं. तरुण श्रोत्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी कवीही तरुण (आणि सुंदर, आकर्षक) हवेत, असं त्यांचं म्हणणं होतं. मग असं असेल तर, आजवर अनेक वयस्कर, प्रौढ, वृद्ध कवींनी लिहिलेल्या विलक्षण तरल, आशयघन, सुंदर कविता मोडीतच काढाव्या लागतील. खरंतर जी उत्कृष्ट कविता आहे, ती चिरतरुण असते. प्रेमकविता तर असतेच असते. ती तरुण कवीनं लिहिलेली असो, की, वृद्ध कवीनं. किंबहुना वृद्ध कवी जी प्रेमकविता लिहितो, ती अधिक प्रगल्भ, परिपक्व असते आणि तीच तरुणांना अधिक आवडते. भा. रा. तांबे यांनी कविता लिहायला सुरुवात केली, तीच मुळी सत्तरीनंतर. पण त्यांनी त्यानंतर लिहिलेली डोळे हे जुल्मी गडे रोखुनि मज पाहू नका जादुगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका ही कविता असो, की, ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे किंवा न...